

T NEWS मराठी नेटवर्क –
एटापल्ली (प्रतिनिधी)
एटापल्ली तालुक्यातील मेंढरी, गर्देवाडा व वांगेतुरी या ग्रामपंचायतींमध्ये अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकांमधून सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यांची निवड करण्यात आली. या निवडणुकांमुळे संबंधित गावांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या सत्कारानिमित्त मंगळवारी राजवाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवा नेते तथा अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांची भेट घेतली.
यावेळी आमदार डॉ. आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाचे दुपट्टे परिधान करून नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. त्यांनी सर्वांचे अभिनंदन करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामविकासाच्या दृष्टीने सर्वांनी समन्वयाने व एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर विशेष भर देत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी नमूद केले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























