

T NEWS मराठी नेटवर्क –
सिरोंचा(प्रतिनिधी )माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम हे सिरोंचा दौऱ्यावर काल पासून असून या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गडचिरोली जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी सिरोंचा तालुक्यात उन्हाळी धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी केली.
सिरोंचा तालुक्यातील २०२६ या हंगामातील उन्हाळी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघाले असून अद्याप खरेदी केंद्र सुरू न झाल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. सिरोंचा हा सीमावर्ती व नक्षलग्रस्त भाग असल्याने येथील शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च परवडत नाही. तरी तालुक्यातील सिरोंचा, अमरावती,बामणी,जाफराबाद, पेंटीपाका,मद्दीकुंठा,अंकिसा, आसरअल्ली,वडदम,विठ्ठलरावपेटा येथील शेतकरी अडचणीत आले आहेत.धान साठवण्याची सोय नसल्याने व पावसाळा तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात खासगी व्यापाऱ्यांना धान विकावा लागत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांचे नुकसान होत आहे.
या वेळी आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी संबंधित विभागाला सूचना करून त्वरित धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच धान साठवणुकीसाठी तात्पुरत्या गोदामांची व्यवस्था करण्याबाबतही कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होणार नाही,हा शब्द त्यांनी या वेळी दिला.
निवेदन सादर करताना सतीश भोगे,सतीश राचर्लावार,नरेश अलोने,मधुकर इंगली,ओदेलू नस्कुरी,संपत अंबाला,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर सेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























