


तिरुपती चिट्याला
T NEWS मराठी नेटवर्क- स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुकांना घेत आता गडचिरोली जिल्हयात विविध घडामोडी घडत आहेत.यावेळी आपली पूर्ण शक्ती पणास लाऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीवर कब्जा मिळवूच असे स्वप्न बघत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार हे प्रयत्न करित आहेत.पण आता त्यांच्याच बालेकिल्यातील स्थानिक नेते एक एक करून त्यांच्यापासून दूर जात आहेत. दक्षिण सिरोंचा विभागातील प्रचंड जनाधार असणारे नेते तथा कंकडालवारांचे समर्थक बानय्या जगनाम यांनी आता त्यांची साथ सोडली आहे.आपणावर व अनेक सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात असल्याची भावना निर्माण झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.याचा मोठा फटका अजय कंकडालवार यांना बसू शकतो असे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.कंकडालवारांची साथ सोडल्यानंतर जागनाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ( अजीत पवार) गटात प्रवेश घेतला आहे.
या प्रवेशामुळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर कंकडालवार यांच्या अहेरी आणि सिरोंचाच्या राजकीय गडाला ‘मोठा सुरंग’ लागल्याचे मानले जात आहे.
काँग्रेसकडून अवहेलना आणि उपेक्षा –
बानाया जनगाम हे दोन वर्षांपूर्वी माजी आमदार दीपक आत्राम यांची साथ सोडून अजय कंकडालवार यांच्यासोबत काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना योग्य स्थान मिळाले नाही.
“काँग्रेस पक्ष नेतृत्वाने माझा प्रवेश झाल्यावर सिरोंचा तालुक्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. काँग्रेस श्रेष्ठींनी तालुक्याला प्रतिनिधित्व दिले नाही आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. जिल्हास्तरावरील नेत्यांकडून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची अवहेलना चालू राहिली. जिल्हाध्यक्षांनी सिरोंचा तालुका कार्यकारिणी बनवण्यासंदर्भात वारंवार वेळकाढूपणा केला. एका प्रकारे आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते बाजूला फेकलेले होतो, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला.” असे बानय्या जनगाम यांनी T NEWS मराठी (डिजिटल मीडिया) शी व्यक्त केली आहे.
कंकडालवार यांच्यासाठी ‘काटेरी’ वाट –
बानय्या जनगाम यांचा हा निर्णय अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वासाठी धोक्याची घंटा ठरला आहे. कंकडालवार हे अहेरी क्षेत्रासोबतच सिरोंचा क्षेत्रातूनही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याची शक्यता होती. मात्र, सिरोंचा भागात मोठा जनाधार असलेल्या आणि त्यांचे खंदे समर्थक असलेल्या बानय्या जनगाम यांनीच पक्ष सोडल्यामुळे, सिरोंचा तालुक्यातून कंकडालवार यांच्या लढण्याची वाट आता ‘काटेरी’ झाली आहे.
राष्ट्रवादीला काँग्रेस (अजित पवार) गटाला बळ; काँग्रेसला फटका-
बानय्या जनगाम हे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सिरोंचा तालुक्यात सामान्य नागरिकांचा सेवा आणि ग्रामीण भागाचा विकासासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मार्फतीने सिरोंचा तालुक्यात अनेक विकास कामे केले आहे त्यामुळे यांचा जनाधार सिरोंचा पट्ट्यात चांगला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या सीमावर्ती भागात अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसमध्ये कोंडी झाल्याने अजय कंकडालवार स्वतःही पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा असताना, त्यांच्याच विश्वासू सहकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेवर गंभीर परिणाम करणारा ठरू शकतो. कंकडालवार यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याकडे आता अहेरी विधानसभासह गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



























