


T NEWS मराठी नेटवर्क –
गडचिरोली: जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या मद्यनिर्मिती प्रकल्पाच्या जनसुनावणीवरून सध्या वादंग निर्माण झाले आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि देवाजी तोफा यांनी या प्रकल्पाला जो विरोध दर्शविला आहे, त्यावर गडचिरोलीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष ताटीकोंडावार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संतोष ताटीकोंडावार म्हणतात की, “ज्या जिल्ह्यात आधीच दारूबंदी लागू आहे, तिथे व्यसनमुक्तीच्या नावाखाली शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. जर ही दारूबंदी प्रभावी असेल, तर मग या निधीची उधळण कशासाठी? आणि जर जिल्ह्यात मद्यनिर्मितीचा कारखाना उभा राहत असेल, तर त्यातून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अशा स्थितीत विकासकामांना खीळ घालण्याचे काम का केले जात आहे?”
ताटीकोंडावार यांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्दे:
रोजगाराची संधी: गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात उद्योगांची मोठी गरज आहे. मद्यनिर्मिती प्रकल्पामुळे केवळ थेट रोजगारच नव्हे, तर पूरक व्यवसायांनाही चालना मिळेल. विकासाच्या आड येणे म्हणजे जिल्ह्याच्या प्रगतीला रोखण्यासारखे आहे.
व्यसनमुक्तीवर खर्च: जिल्ह्यात दारूबंदी असतानाही व्यसनमुक्ती मोहिमेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. या खर्चाच्या फलश्रुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हा पैसा जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांसाठी का वापरला जात नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.
विकासात अडथळा कशाला?: डॉ. अभय बंग आणि देवाजी तोफा यांसारख्या मोठ्या व्यक्तींनी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला विरोध करण्याऐवजी, नियमांच्या चौकटीत राहून उद्योग कसे वाढतील याकडे लक्ष दिले पाहिजे.
“गडचिरोलीतील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कामाची गरज आहे. केवळ विरोधासाठी विरोध करून जिल्ह्याला मागे ठेवण्याचे प्रयत्न थांबवावेत,” असे आवाहनही संतोष ताटीकोंडावार यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.






























