सिरोंचातून बिबट्याच्या कातडीची तस्करी- आरोपींना तेलंगाणा वनविभागाद्वारे अटक

633

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा वाळू, गांजा, दारू, तांदूळ तस्करीमुळे सतत चर्चेत असते. आता त्यात बिबट्याच्या कातडीच्या तस्करीची भर पडली आहे. 20 मे रोजी सिरोंचा वनविभागाचा तपासणी नाका ओलांडून दोन दुचाकीवरून बिनबोभाटपणे बिबट्याच्या कातडीसह तेलंगाणात प्रवेश केला. मात्र, तेलंगाणा वनविभागाच्या सतर्कतेमुळे ते पकडले गेले. पवन (31) रा. वरदल्ली, बरेगुडा, भूपालपट्टणम, छत्तीसगड आणि बाबर खान (42) रा. लिंगापूर (वि), बरेगुडा, भूपालपट्टणम, छत्तीसगड अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी, दोन दुचाकी व दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील वनउपज तेलंगाणात जाऊ नये, यासाठी प्राणहिता व गोदावरी या प्रमुख नद्यांवर सिरोंचा वनविभागातर्फे दोन वननाके सुरू आहेत. 20 मे रोजी सिरोंचातून दोन दुचाकीवरून दोघे बिबट्याची कातडी घेऊन प्राणहिता नदीपुलावरून तेलंगाणात पोहोचले. या पुलावर सिरोंचा वनविभागाचा नाका आहे; पण कर्मचाऱ्यांनी दोन्ही दुचाकी तपासल्या नाहीत. तेलंगाणातील मंचेरियल जिल्ह्यातील रापनपल्ली चेकपोस्टवर मात्र ते दोघे पकडले.
सिरोंचाच्या उपवनसंरक्षक पूनम पाटे यांनी दुर्गम, अतिदुर्गम भागातील रस्ते, पुलाची कामे वनकायद्याचा दंडुका दाखवत रोखली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन समिती बैठकीत त्यांना यावरून सुनावले होते. वनकायद्याचा धाक दाखवून विकासकामे रोखणाऱ्या उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्या अखत्यारित आंतरराज्य सीमेवरील पुलावरून वनउपज्ञाची तस्करी कशी काय होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here