


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
गडचिरोली(प्रतिनिधी )
माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने नक्षल गावबंदी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सोमवारी, (दि. 24) उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील मोरडपार, आलदंडी, कोयर, गोपणार व मुरुंगल या पाच गावातील नागरिकांनी नक्षल गावबंदी ठराव पारित करीत पाच भरमार बंदुकांसह 200 ते 300 सलाखी जमा केल्या. उपविभाग भामरागड हद्दीत मागील दहा दिवसांत 13 गावांनी माओवाद्यांना गावबंदी केली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचेसमोर जहान नक्षली गिरीधर तुमरेटी याने सहपत्नी ललीता चैतु उसेंडी यांनी आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे माओवाद्यांचा बालेकिल्ला समजला जाणा-याया भामरागड व अबुझमाड जंगल परिसरातच मोओवाद्यांच्या अस्तित्वाला खिंडार पडली आहे.
जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील मोरडपार, आलदंडी, कोयर, गोपणार व मुरुंगल या पाच (05) गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानूमते नक्षल गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी उपपोस्टे लाहेरी यांना सादर केला. सदर गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. तसेच गावातील काही सदस्यांचा माओवाद्यांना पाठिंबा होता. परंतू मागील तीन वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांतर्गत पोलीस दलाप्रती गावकयांचा विश्वास दृढ झाला. तसेच माओवादी हे जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावक-यांच्या लक्षात आले. याअंतर्गत सोमवारी उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील संबंधित गावातील गावकयांनी हा नक्षल गावबंदी ठराव संमत केला तसेच यापूढे गावामार्फत कोणत्याही माओवादी संघटनेस गावबंदी करण्याचा निर्णय घेत पथकाला नुकसान पोहचविण्याच्या उद्देशाने जंगलात लपवून ठेवलेले पाच भरमार बंदूक तसेच जंगलात खड्डे करुन त्यात पुरुन ठेवलेले धारदार लोखंडी 200 ते 300 सलाखे पोलीसांच्या सुपूर्द केले. यासोबतच पोस्टे धोडराज हद्दीतील नेलगुंडा गावातील नागरिकांनी गावात नक्षल गावबंदी केल्याचा ठराव पोस्टे धोडराज येथे सादर केला होता. त्यामुळे आज येथील गावकयांनी पोस्टे धोडराज हद्दीत सुरक्षा रक्षक दलांना नूकसान पोहचविण्याच्या उद्देशाने जंगलात खड्डे करुन त्यात पुरुन ठेवलेले 450 सलाखे व कुकरमध्ये ठेवलेल्या आयडी सदृश वस्तू पोस्टे धोडराज येथे जमा केले.

सदर नक्षल गावबंदी ठराव करणाया पाच गावातील नागरिकांचे पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले असून, अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनी माओवाद्यांच्या खोट्याप्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहावे. गडचिरोली पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्रास माओवादी मुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.






























